मनोज जरांगे यांच्या इमानदारीच्या कहाण्या



मनोज जरांगे यांच्या इमानदारीच्या कहाण्या..!

आपला मृत्यू आपल्या डोळ्यासमोर दिसत असताना सुद्धा मनोज जरांगे समाजासाठी आपला हट्ट सोडायला तयार नाहीत, आजच्या काळात सरकारी कार्यालयासमोर तंबू ठोकून तोडीपाणी करणारे लोक कमी नाहीत, अगदी खूप इमानदार आहे असा वाटणारा माणूस सुद्धा खूप सिक्रेट लेव्हलला कसे शेण खातात हे मी अगदी जवळून पाहिले आहे पण या काळात मनोज जरांगे सारखा निष्पाप हिरा दंड थोपटून उभा राहतो ही बाब निव्वळ एक आश्चर्य आहे.

मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू झालं तेंव्हा मी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची अवस्था समाजासमोर मांडली होती, पत्र्यांचं घर आणि अगदी महिनाभर पुरेल इतकं रेशन हीच त्यांची संपत्ती होती, ही परिस्थिती समोर आल्यानंतर समाजातील अनेक धनिकांनी मनोज जरांगे यांना देणगी स्वरूपात मदत देऊ केली पण मनोज जरांगे ही मदत घ्यायला तयार होईनात लोक मदत देण्यासाठी घरापर्यंत पोचले तेंव्हा त्यांनी बायकोला घराला कुलूप लावून बाहेर जाऊन बसायला सांगितलं, मी सुद्धा जेंव्हा मनोज जरांगे यांना या देणग्या स्वीकारल्या पाहिजेत यात काहीच वाईट नसतं उलट पूर्वीच्या काळी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीच्या जाहीर मिरवणूका काढल्या जायच्या आणि मदत म्हणून त्यांना पैश्यांच्या थैल्या दिल्या जायच्या आणि त्या स्वीकारल्याही जात असत एखादा निष्ठावंत व्यक्ती आशा थैल्या सामाजिक कार्याला देऊन टाकत असत त्यामुळे या देणग्या स्वीकारल्या पाहिजेत अशी भूमिका मी मांडली त्यावर मनोज जरांगे यांज “मी फाटका म्हणून जन्माला आलोय मला फाटका म्हणून मारायचं आहे मला देणग्या नाही घ्यायच्या मला फक्त आरक्षण घ्यायचं आहे” असं स्पष्ट सांगितलं.

पुढे बीड जिल्ह्यातील एक माजी आमदार मनोज जरांगे यांच्या जुन्या संपर्कातील भेटायला आले आणि त्यांनी मनोज जरांगे यांना त्यांच्या एका मुलीचं शिक्षण मी करतो असं सांगितलं त्यावर मनोज जरांगे यांनी त्याच तडफेने उत्तर दिलं “माझ्या मुलीचं शिक्षण तुम्ही करायला तिचा काय बाप मेलाय का?” असा सवाल विचारला, आणि त्या माजी आमदारांना स्टेजच्या खाली उतरून दिलं.

पुढे मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरच्या एका रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या काही समविचारी मित्रांनी त्यांच्यासमोर एक संकल्पना मांडली की मराठा आरक्षणाचा मुद्दा संपल्यावर पुढे आपल्याला काम चालू ठेवण्यासाठी एखादी सामाजिक संस्था उभी करावी लागेल, यापूर्वी आशा संस्था अण्णा हजारे, विनोबा भावे अगदी महात्मा गांधी यांनी सुद्धा उभारल्या होत्या त्या धर्तीवर आपणही संस्था उभारावी समाजातून निधी उभा करून एक मोठं सामाजिक कार्य निर्माण करता येऊ शकतं आणि भविष्यात आपल्या लढ्याला या संस्थेचे पाठबळ मिळत राहील त्यामुळे संस्था फार गरजेचे आहे अशी भूमिका मांडली, यावर सुद्धा मनोज जरांगे यांनी ठामपणे नकार दिला, “मला आयुष्यात काहीच करायचं नाही फक्त मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं आहे” इतकीच भूमिका स्पष्ट केली… या माझ्यासमोर घडलेल्या मनोज जरांगे यांच्या इमानदारीच्या कहाण्या आहेत.

मनोज जरांगे हा माणूस एक भाकर सुद्धा टोचून खाणारा माणूस आहे. माघे मनोज जरांगे यांच्या शिवबा संघटनेतील कार्यकर्त्यांनी कोपर्डीतील आरोपींवर न्यायालयात हल्ला केला, हल्ला करणारे जेल मध्ये अडकले तेंव्हा मनोज जरांगे यांनी शपथ घेतली की जोपर्यंत माझे सहकारी सुटणार नाहीत तोपर्यंत मी माझ्या घराचा उंबरा चढणार नाही, बस तिथून पुढे दोन वर्षे मनोज जरांगे पुंडलिक नगरच्या एका होस्टेलवर मुलांच्या रूमवर राहायचे आणि तिथे विजय काकडे आणि इतर सहकारी त्यांना डब्बा आणून द्यायचे मी अधून मधून त्यांना तिथे भेटायला जायचे गेल्यानंतर विजयकाकडे चहा पाजायचे मी जाण्याची आधी जर काकडे-जरांगे यांचा चहा झाला असेल तर मी गेल्यानंतर चहा डबल होईल म्हणून ते पुन्हा चहा घ्यायचे नाहीत कारण आपल्याला संभाळणाऱ्यांना आगाऊ बुर्दंड होऊ नये म्हणून हात आखडता घेणारा हा माणूस होता, जगताना इतक्या काळजीने हा माणूस वागत असे.

आता अलीकडे उपोषण सुटल्यानंतर मनोज जरांगे गॅलक्षी हॉस्पिटलमध्ये दाखल होते तिथे त्यांना कुणीतरी आरोग्यला चांगले असतात म्हणून तुपात भिजवलेले पराठे जेवणासाठी आणले होते, मी घरी असताना त्याच दिवशी मला त्यांचा फोन आला दत्ताभाऊ कुठं आहेत, मी म्हटलं घरी आहे जेवण करतोय ते म्हणाले काय भाजी आहे? मी म्हटलं वांग्याची भाजी आहे. लगेच मनोज पाटील म्हणाले भाऊ ते तर आपलं फेवरेट आहे या घेऊन, मी डब्बा घेऊन रुग्णालयात दाखल, मनोज जरांगे पाटलांनी समोर वाढलेले पंच पक्वान्न बाजूला सारले आणि माझ्या वांग्याच्या भाजीचा डब्बा खाल्ला, खाऊन थोडा उरला तर तोही मनोज जरांगे यांनी दुसऱ्या डब्यात काढून घेतला आणि म्हणाले दुपारी पण हाच खाणार, सायंकाळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला आवर्जून फोनवर सांगितले की दत्ताभाऊ मनोजभाऊनी दुपारी तुमचाच डब्बा खाल्ला. ही एका फाटक्या माणसाची कहाणी आहे जो ताटातली तूप रोटी नाकारतो आणि गरिबांच्या घरातले प्रेम ओतप्रोत प्राशन करतो. हा लढवय्या मराठा आरक्षणासाठी रिंगणात उभा आहे. मराठ्यांनी निश्चिन्त रहावं करण तुमचं भविष्य अत्यंत सुरक्षित हातांमध्ये आहे.

दत्ताभाऊ कानवटे
पत्रकार, tv9 मराठी, छत्रपती संभाजीनगर

Leave a Comment