महाराज सयाजीराव गायकवाड आदर्श राजा
भारत खंडाचा शेवटचा आदर्श राजा श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड
महाराज सयाजीराव गायकवाड आधुनिक व पुरोगामी शासक महाराज सयाजीराव गायकवाड आदर्श राजा

प्रारंभिक आयुष्य
आज श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची १५७ वी जयंती, महाराजांचे मुळ नाव गोपाळ काशीराम गायकवाड, महाराजांचा जन्म ११ मार्च १८ ६३ रोजी कौळाणे ता मालेगाव जि नाशिक खान्देशात झाला, वयाच्या अकराव्या वर्षा प्रर्यत गोपाळ गुराखी होता व वयाच्या १२ व्या वर्षी बडोद्यात महाराज खंडेराव गायकवाड यांना दत्तक गेले.
शासक म्हणून सुरुवात
दिवाण सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. २८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजीराव महाराज यांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या.

न्यायव्यवस्थेत सुधारणा कलाभुवन’ स्थापन
(१८८३),. न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या,. ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४); पंचायत राज व्यवस्था, तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली. संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले (१९०६). गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली.
औद्योगिक कलाशिक्षणाकरिता ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली. त्यांनी ‘प्राच्य विद्यामंदिर’ या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. सयाजीरावांनी ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली.
भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक
त्यांनी संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली;. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली. त्यांनी या काळामध्ये इंग्लंड अमेरिकेसारख्या देशांना भेट दिली. तेथील शिक्षण पद्धती आणि ग्रंथालय यांनी ते प्रभावित झाले. अशाच प्रकारची शिक्षण व्यवस्था आणि ग्रंथालये आपल्या देशातही निर्माण झाली पाहिजेत. या दृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी ग्रंथालय तज्ञ बॉर्डन यांना भारतामध्ये आमंत्रित केले.व भारतातील सर्वात मोठे ग्रंथालय सुरू केले. ते दहा वर्ष बडोदा संस्थानांमध्ये ग्रंथालय प्रमुख म्हणून कार्यरत होते. बॉर्डन यांच्या मार्गदर्शनाखाली बडोदा संस्थानात ग्रंथालयाचे जाळे निर्माण करण्यात आले संस्थानांमध्ये अनेक ग्रंथालये स्थापन करण्यात आली. फिरती ग्रंथालये, ग्राम ग्रंथालये सुरू झाली. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी स्वतः ग्रंथालयशास्त्राचे शिक्षण घेतले होते. खऱ्या अर्थाने ते भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक आहेत.
सामाजिक सुधारणा
सामाजिक क्षेत्रात सयाजीराव गायकवाडांनी केलेली कामगिरीही त्यांच्या सामाजिक सुधारणेची साक्ष देणारी आहे. पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रयबंदी,हिजड्यांच्या लिंग छेदावर बंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मॅट्रीक नंतरची शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली, तसेच उच्च शिक्षणासाठी लंडन पाठविले व पाऊण लाखाची शिक्षवृत्ती दीली, आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४).
वास्तू निर्मिती
बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली, याचे कारण त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू. लक्ष्मीविलास राजवाडा, वस्तुसंग्रहालय, कलावीथी, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे. महाराज सयाजीराव गायकवाड हे दातृत्वासाठी नेहमी तत्पर असत. सत्पात्री दान देण्यात ते नेहमीच अग्रेसर होते. हिंदुस्थानातील नव्हे तर जगातील अनेक गरजवंतांना त्यांनी उदार हस्ते मदत केली होती. ज्यावेळी पुत्रवत प्रेम असणारी त्यांची प्रजा संकटात असेल त्यावेळी त्यांचे दातृत्व आणि कार्य खूपच मोलाचे ठरलेले दिसून येते.
नियोजन आणि व्यवस्थापन
सयाजीराव प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक करत हे नियोजन करत असताना ते नेहमीच दूरदृष्टी ठेवत. त्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन नेहमीच उत्कृष्ट असे. महाराज अशा प्रकारची मदत करत असताना प्रजेला परावलंबी करण्यापेक्षा स्वावलंबी करण्याकडे त्यांचा मोठा कल असे. शंभर वर्षांपूर्वी महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उद्भवलेल्या गंभीर संकटाचे उत्तम व्यवस्थापन करून जनतेला दिलासा प्राप्त करून दिला.
या संकटात महाराजांनी संस्थानातील सर्व यंत्रणा कार्यरत केली. लोकांना मदत पोहोचवली. दुष्काळाच्या काळात ज्यावेळेस ते दौऱ्यावर होते, त्यावेळेस शेतकरींची अवस्था बघुन त्यांना रडू कोसळले, त्यांनी त्वरीत दरबारातील चांदीचे हत्ती घोडे मोडून बारडोली, गणदेवी परीसरात लगेच मदत केली, पहिला साखर कारखाना गणदेवी येथे उभारला, सयाजी सरोवर बांधले, शेतकरी करीता बॅक आॅफ बडोद्याची स्थापना केली.
जनतेचे कल्याण हाच माझ्या जीवनाचा ध्यास
ते प्रजाहितदक्ष राजे होते. जनतेचे कल्याण हाच माझ्या जीवनाचा ध्यास आहे असे ते म्हणत. या विचारांप्रमाणे त्यांनी संपूर्ण आयुष्य प्रजेसाठी व्यतीत केले शिक्षणाचे महत्त्व या जाणत्या राजाने जाणले होते. अनेक सुधारणा करताना त्यांनी शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला. शेतकरी वर्गाला त्यांनी दुष्काळ आणि अतिवृष्टी या काळात मदत केली
बडोद्यात १९२७च्या जुलै महिन्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. यावेळी चार दिवसांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडला. यावेळी वाघोडियामध्ये ५५ इंच पावसाची नोंद झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नदी-नाल्यांना महापूर आला. हे सर्व अचानक घडले. लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी आपली घरेदारे जनावरे व साधनसंपत्ती सोडून पलायन करावे लागे.पूर्वी अशा संकटांची पूर्वसूचना देण्यासाठी यंत्रणा नव्हती. त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.






या काळात थोडीफार असणारी संपर्क यंत्रणा कोलमडली. कोणत्या भागात किती नुकसान झाले याची माहिती समजायला थोडा वेळ लागला. परंतु पुराची भीषणता आणि झालेली जीवित आणि वित्तहानी पाहता बडोद्यातील प्रशासन ताबडतोब कामाला लागले. या महापूरातून सर्वप्रथम प्रशासनाने वेगवेगळ्या भागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आणि कमीत कमी हाणी कशी होईल याकडे लक्ष पुरवले.
त्यासाठी उपाययोजना केल्या. लोकांबरोबर शेतकऱ्यांच्या जनावरांनाही सुरक्षित स्थळी हलवले. अधिकारी आणि अधिकारी नसलेल्या लोकांनी ही सर्व प्रकारच्या मदत कार्यात भाग घेतला. शहरात सर्वांनी मिळून काम केले. उपलब्ध असलेल्या सर्वच साधनांचा वापर करून स्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. निराधार आणि बेघर लोकांना तात्काळ मदत पुरवली.
बडोदा शहर आणि इतर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक इमारती आणि धर्मशाळा नागरिकांसाठी खुला करण्यात आल्या. लोकांना मदतीसाठी सरकारतर्फे तातडीने पन्नास हजार रुपये मंजूर करण्यात आले. प्रशासनाच्या या सहकार्यामुळे महाभयंकर पुराच्या काळातही लोकांना दिलासा मिळाला.
प्रवासाची आवड
सयाजीराव गायकावाडांना प्रवासाची अत्यंत आवड होती, असे म्हणतात व्यासांनी जग उष्टविले, तसेच महाराजांनी जग भ्रमण केले. त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे जे चांगले असेल, ते ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते.
१३ भारत रत्नांना मदत
लो. टिळक, बाबू अरविंद घोष या थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. त्यांनी १३ भारत रत्नांना मदत केली, राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असे म्हटले जाते. ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले.
भारत खंडाचा शेवटचा आदर्श राजा
हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी केले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांना बडोद्यात बोलवून त्यांचा भव्य सत्कार केला होता. ज्योतीबांचे शेतकऱ्यांचे आसूड ह्या पुस्तकाचा प्रकाशनाचा संपूर्ण खर्च महाराजांनी केला होता, तसेच महात्मा फुले यांनी महाराजांवर पोवाडा लिहिला आहे, महात्मा ज्योतिबा गेल्यावर सुध्दा सावित्रीबाई फुले यांना मरेपर्यंत पेंशन दिली होती.
यशवंत आजारी असतांना मदत केली होती, दादाभाई नौरोजी यांना परदेशात निवडणूक लढविण्यास निधी दिला होता. भुमिगतांना व त्यांच्या परिवारांना आर्थिक मदत केली होती, आज मुंबईत पोलीस मुख्यालय आहे त्याचा बांधकामाचा संपूर्ण खर्च गायकवाड परिवाराने केला आहे.
असा हा राजा दुर्लक्षित का राहिला हे न उमगलेले कोढे आहे. ज्यांच्या मदतीने १३ भारत रत्न घडले, ते मात्र उपेक्षित राहिले, आम्ही खान्देशी लोक सुध्दा इतके करंटे आहोत की, आमचा राजा आम्हाला सुध्दा कळाला नाही.
राजा अशोक सम्राट व छत्रपती शिवाजी महाराज यांचे संयुक्त मिश्रण म्हणजे सयाजीराव
श्रीमंत सयाजीराव महाराज यांचे ज्या वेळेस मुंबईत देहावसान झाले, त्यावेळेस आचार्य अत्रे यांनी मराठा मध्ये अग्रलेख लिहिला होता की, राजा अशोक सम्राट व छत्रपती शिवाजी महाराज यांचे संयुक्त मिश्रण तयार करुन जे रसायन तयार होईल ते रसायन म्हणजे श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड होय.
अश्या ह्या भारत वर्षाच्या, भारत खंडाच्या शेवटच्या आदर्श राजास त्यांच्या जयंती निमित्त खान्देश हित संग्राम व तमाम खान्देश हित संग्राम च्या कार्यकर्त्यांकडून कोटी कोटी प्रणाम!
प्रवक्ता
खान्देश हित संग्राम
सुरेश पाटील ९००४९३२६२६
1 thought on “महाराज सयाजीराव गायकवाड आदर्श राजा”